top of page

Sushant Singh Rajput...

Updated: Aug 27, 2020

शरयुला पहाटेच्या मंद गार वा-याच्या झुळूकीने अलगद जाग आली.बाजुच्या साईट टेबलवरील मोबाईल वर बघते तर पहाटेचे अवघे साडेतीन.सावकाश अलगद पावलांनी उठून फ्रेश होऊन आली.थंडगार वारा व मंद सुवासिक मोग-याचे माठातील ग्लासभर पाणी.तन व मन दोन्हीही सुखावले. पलंगावर वज्रासनात बसुन गुरुंच्या ध्यानात क्षणात लिन झाली.आजुबाजुच्या सृष्टीचा जणू विसरच पडला होता.बंद डोळ्यांसमोर निळेशार आकाश,हिरवीगार वैभवसंपन्न सृष्टी,कानावर पडणारा कोकीळेचा कुहु कुहू आवाज ,कोंबड्याचे आरवणे,गॅलरीतील रातराणीचा धुंद सुवास,गावरान गुलाबाचा गोडवा व परमपुज्य गुरुदेवांची मानसपुजा. किती सहज जीवनाचा अविभाज्य भाग झाल होत सर्व. अचानक घड्याळ्याच्या कर्कश बेलच्या आवाजाने भानावर आली तर पाच वाजुन गेले होते. पुन्हा डोळे मिटुन अलगद दयाघन गणपतीबाप्पाच्या चरणकमलांवर मस्तक ठेवून उठली. मग मात्र लगबगीने कामाला लागली.या लाॅकडाऊनच्या दरम्यान छान आराम चालला होता.पण आता मात्र फिरुन डब्याची लगबग.देह काहीसा आळसावला होता.पण मन पुन्हा पुन्हा फ्रेश होत होतं. एका बाजुला छान सुंठचहाचे आंदण उकळत असताना ती नेहमीच्या सराईत पणे पोळी भाजीच्या तयारीला लागली. कढईत भाजी फोडणीला घालुन परातीत पोळीचे पीठ मळून ठेवले. व चहाचा मग घेऊन अलगद सोफ्यावर रेलुन बसली.क्षणभर हसु आले कारण हा दहा मिनिटांचा खास वेळ म्हणजे स्वर्गसुखच तिच्यासाठी. अचानक पल्लवी तिच्या बेडरुममधून उठुन आली. "आई,सुशांत असा कसा गं आत्महत्या करु शकतो".दोन दिवसांपासुन अगदी हेच चाललं आहे. शरयुने काही न बोलता हातातील मग बाजुला ठेवला व पल्लुला प्रेमाने जवळ घेतले.पोर कासावीस झाली होती. शरयुच्या मनात विचारांचे चक्र फिरतच होते.या लाघवी,गोड निरागस चेह-याच्या अभिनेत्याने आपल्या सहजी अभिनयाचा ठसा उमटवून या पिढीच्याच नव्हेतर आपल्या पिढीतील ही मनामनांवर राज्य केले आहे. अशावेळी आठवली ती आपल्या पिढीतील अप्रतिम अभिनयाची छाप उमटवुन अगदी अल्प वयातच जगाचा निरोप घेणारी अभिनेत्री स्मिता पाटील.पण फरक होता तो दोघांच्या मृत्युंच्या कारणात.स्मिताचा मृत्यु नैसर्गिक शारिरीक व्याधीने तर आज सुशांत सारख्या उमद्या हस-या व्यक्तिमत्वाचा मृत्यु मानसिक अशांततेने.जीव गलबलतोच मनामनांचा.फारच भयंकर.प्रचंड हुशारीचा स्रोत व उत्तम अभिनयाने मन जिंकणा-या सुशांतने हतबलतेने आत्महत्येचा पर्याय स्विकारुन मृत्युला कवटाळावे. अरे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा इतर गोष्टी एवढ्या मौल्यवान कशा होतात.जगण्यासाठी फार कमी साधनसुविधा असावी लागते.प्रत्येक गोष्ट संघर्षाने मिळवणा-या सुशांतने स्वतःच्याच कष्टाची किंमत केली नाही.आपल्यातील प्रामाणिक व दैवी गुणांना डावलुन भ्रष्ट व राजकारणी लबाड धूर्त कारवायांना बळी पडाव.यासारखे दुर्दैव कोणते?आईचे छत्र तर हरपले होते पण आईच्या मृत्युनंतर एकाकी पडलेल्या बापाची साथ सोडताना सुशांतने एवढा स्वार्थी निर्णय कसा व का घेतला?अनाकलनीय व अनुत्तरीत प्रश्नांना जिवंत ठेवून तो मात्र हसत निघुन गेला. कासावीस झालेल्या पल्लवीचा गोंडस चेहरा हातात घेऊन भरलेल्या डोळ्याने शरयुने एवढेच म्हटले,"राणी,नेहमीकरता लक्षात ठेवायचं. हे अमुल्य जीवन ईश्वराने मातापित्यांच्या रुपाने आपल्याला दिलेले असतं.ते असं अविचाराने पणाला लावण हा ईश्वराचा च अपमान आहे.कारणं कितीही सबळ असली तरी त्याचे समर्थन होऊच शकत नाही.पडद्यावरच्या भुमिकेत हदयांवर राज्य करणारा सुशांत ख-या आयुष्यात मात्र आपल्या स्वतःच्या ह्दयावर विजय मिळवु शकला नाही. ईश्वराची आराधना व विश्वास हा फार मोठा पर्याय त्याने गमावला.श्रध्दा व सबुरीला त्याने महत्वच दिले नाही.आत्महत्या हा जगण्याचा पर्याय नाही होऊ शकत.तेव्हा कटु आहे पण सत्य आहे जर ही आत्महत्या असेल तर हे अयशस्वी व्यक्तिमत्वच. अग बाळु,ज्यावेळेस लेकराला अकारण मृत्युला सामोरं जाव लागत.तेव्हा त्याच्या मातापित्याला फार मोठ्या दिव्यातून प्रत्येक क्षणी जावं लागत. पण ते आत्महत्येचा पर्याय नाही स्विकारु शकत.प्रत्येक लेकरात आपल्या लेकराचा गोडवा पाहून जेव्हा ते भरभरुन जगण्याची उभारी बाळगतात,तेव्हा ईश्वर सहस्त्रकमलांनी त्यांच्यावर मायेची पाखर घालतो.म्हणुन राणी,आता शोक पुरे. झाल हे वाईट झालं पण जर ही आत्महत्याच असेल तर सुशांत हुशार नव्हता मुर्ख होता." पल्लवी सुर्योदयाच्या वेळेचे आईचे ते करारी रुप पाहून थक्क झाली. व हसत आईच्या गालावर पापा देऊन म्हणाली,"आई छान चहा करुन आणते आपल्या दोघींना तु बस." शरयुने सुटकेचा निश्वास सोडला पण अलगद गालावर डोळ्यांतील आसवे ओघळली.शब्द ही थरथरले, 'असा कसा रे पोरा निघुन गेलास?' मनात बहिणाबाईंचे शब्द साचले. देवा आसं कसं रे मन? आस कसं रे घडलं! कुठे जागेपनी तूले असं सपन पडलं। सुशांतसिंग राजपुत भावपूर्ण शब्दांजली



लेखिकाः सौ.रत्नप्रभा-शैलजा शिरवाडकर.

Comments


©2020 by micup.in

bottom of page