ती
- Mic Up
- Aug 30, 2020
- 2 min read

आज lockdownचा अठरावा दिवस.तिने सकाळी उठून फ्रीजचा दरवाजा उघडला.दुध संपलेले.सणक डोक्यात गेली.उठल्यावर आधी चहाचा शिरस्ता.पण या lock down च्या दरम्यान आजकाल खुपदा असच होतयं.चला तर मग आजचा दिवस असाच वैतागत जाणार.
सगळ्यांना सुट्टया.पण हिची मात्र काम संपता संपत नाहीत.रात्री जमिनीला कधी पाठ लागते असं होत अगदी.डोक्यात विचारचक्र चालु होतं.आता ह्यांना सांगाव दुध आणायला .आज कोणत्याही परिस्थितीत जास्तीचा किराणा आणायलाच हवा.पुढे परिस्थिती किती भयंकर होईल,ही कल्पना ना केलेलीच बरी!!
दोन दिवसांपुर्वीच टळटळीत दुपारी बाजारात जाऊन आल्यापासूनच तगमग होते आहे। जीवाची.आज मात्र संध्याकाळी जावं म्हणजे गारव्यात थकवा कमी येईल.तिच्या निर्णयाने ती स्वतःच सुखावली.टि.व्ही पण बिघडला आहे. electrician ला कसा बोलवायचा?जाऊदे.
म्हणुन विचारांना शिताफीने दूर सारुन ती लगबगीने कामाला लागली.
झाडझुड ,लादी पुसणे नित्याची कामे संपल्यावर जीव लावून देवपुजा सुध्दा झाली.हात जोडून देवघरातील बाप्पाला
कळवळून सांगितले.
चिंता,क्लेश,दारिद्र्य दुःख
अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी।।
डोळे भरुन आले दुःखावेगाने.
दिवसभराच्या कामात संध्याकाळी साडेसहा कधी वाजून गेले कळलेच नाही.चला तासाभरासाठी तरी बाहेर जावेच लागणार.
पट्कन घरातील कोणी आरडाओरड करण्याआधीच सामानाच्या भल्यामोठ्या दोन पिशव्या व पर्स घेऊन बाहेर पडली सुध्दा.युध्दावर निघालेल्या सशस्र योध्याप्रमाणे तोंड पुर्णतः ओढणीने झाकलेले होते.
शहरातील मध्यवर्ती वाहता रस्ता आजकाल सुनसान होता.आज तर अगदीच कोणी एखाद दुसरच दिसत होते.दुकानेही सारी बंद दिसत होती.कुठे भाजीवाल्यांचा पत्ता नाही.आज सामान घेऊनच घरात पाय ठेवायचा .या निश्चयाने पावले पडत होती.स्टेशनच्या आसपास येऊन थबकली.काय करावे सुचेना?

रस्त्याच्या पलीकडे चार पोलीस उभे होते.त्यातील एक लेडीज पोलिस होती. हिला बघुन कुजबूज झाली.तिच्या छातीत धस्स झाले.तेवढ्यात रस्ता क्राॅस करुन एक पोलिस धावत तिच्याजवळ आला.
'ताई,कुठे निघालात.'
निरागसतेने तिची टकळी सुरुच होती.
"भाऊ,किराणा भरायचा आहे.पुढे परिस्थिती गंभीर झाली तर खाणार काय?"
तिला मध्येच तोडत पोलिस म्हणाला,
'वाजले किती?'
'अजुन पावणेआठच तर वाजलेत.'
"संध्याकाळी पाचलाच हल्ली दुकाने बंद होतात .माहित नाही का तुम्हांला?"
आता मात्र ती गांगरली.
"आमचा टि.व्हिच बंद आहे."
पोलिसाने एक क्षणभर तीच्या संसाराच्या समर्पणाला न्याहाळून म्हटले,"ठिक आहे.
शेजारी कोप-यावर एकच दुकान उघड आहे.दहा मिनिटात ते सुध्दा बंद होईल.जा लवकर."
पळत्या फळाची आज्ञा घेऊन तीने भराभर सामान घेतले.गहु तांदुळ वगैरे वगैरे.
परत दहा मिनिटात रिक्शासाठी रस्त्याच्या कोप-यावर.
पुन्हा पोलिस समोर.हिच्या बरोबरचा किराणा सामान बघुन अचंबित.
"ताई,आता हे कसं नेणार?
"रिक्शाने"ती म्हणाली.
तिच्या आत्मविश्वासावर हसाव की रडाव ,ओरडाव तेच पोलिसाला उमजेना.
"किती लांब रहाता तुम्ही?"
"चालत दहा मिनिटे.रिक्शाने दोन मिनिटे", ती उत्तरली.
"द्या ते सामान .तुम्ही चला पुढे पटकन.
असे म्हणुन एका झटक्यात दोन्ही बाचकी उचलून लांबलाब
ढांगा टाकत तो चालायलाही लागला.
ती आश्चर्यचकीत.
दिवसभर घरात आपणच राबराब राबतो या विचाराने तिला स्वतःचीच लाज वाटली.
क्षणभर विचार आला,
यानेच तर नव्हे जनाबाईचे जाते ओढले?
अलगदच तीने आकाशाकडे बघुन हात जोडले.
कोरोना काळातील खरे आश्वासक.
लेखिका-सौ.रत्नप्रभा-शैलजा शिरवाडकर.
Comments