top of page

Shree Gurudev Dutt!!!

धाव रे दत्तात्रया पाव रे दत्तात्रया। आदि अन् अंती जग हे भजते तुला। धाव रे दत्तात्रया पाव रे दत्तात्रया।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। श्री नृसिंहमहाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।। मागच्या पौर्णिमेला अर्थात होळीपौर्णिमेस माझी वर्षभरातील पाचवी गिरनार वारी.नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे उठतात. आज पौर्णिमा.प्रकर्षाने आठवण येते. तसं तर क्षणभरही त्या दिव्य पादुकांचे विस्मरण होत नाही. प्रत्येक वारी अभूतपुर्व वैशिष्टांनी भरलेली.मन वायुवेगाने दत्तपावलांना नतमस्तक होते पुन्हा पुन्हा.किती हे भगवंताचे प्रेम!!! होळीपौर्णिमेच्या दिनी गिरनार यात्रा करायची मनोमन इच्छा तर दांडगी पण शक्यता नव्हतीच.कारण मार्च म्हणजे परिक्षांचा मोसम.त्यात नेमका त्याच वेळेस सोमवार धुनी व पौर्णिमेचा सुरेख संगम.मोह पण आवरेना.योगिनीने पुर्ण मोडता घातला .आई नाही म्हणजे नाही.खुपच जास्त लाड चालले आहेत तुझे.माझी परीक्षा आहे.आजकाल तुला सिध्दिविनायक व गिरनार या व्यतिरिक्त फक्त गुरुदेवगायत्री बस. अगं पण राजा जबाबदा-या सगळ्या व्यवस्थित पार पाडते ना मी?तुम्हांला कोणाला काहीच करावे लागत नाही.घरात व बाहेरची कामे ही. पण तु नाही जायचं .संपला विषय. इती माझी योगिनी. सज्जु लहान बहीण .तिची तीव्र इच्छा.म्हटल काढ .तिकीट बघू जसं जमेल तस जाऊया. झाल एक महिना आधी तिकिट्स काढली.वेळेवर सगळ्यांची तिकिटे रद्द.रोज मनोमन मन पाखरासारखं दत्तशिखरावर विराजमान होत होत. त्या महिन्यात जणु वादळासारखे घोंघावत प्रसंग आले.काय काय करावे तेच समजत नव्हते.मुळात घर बदलले.गिरनारला जायच्या पंधरा दिवस आधी.नविन घरात जवळजवळ सामानाचे भलेमोठे सत्तावीस बॉक्स येऊन पडले.मोठ्या वस्तु वेगळ्या .घरातल्या बाकी तिघांना आपापली कामे होती.पण प्रभुंनी एक अनामिक उर्जाच जणु बहाल केली होती मला.घरातली बाहेरची कामे जणु भराभर यांत्रिकतेने चालली होती.कामे शरीर करत होतं मन मात्र निःसंशय पादुकांवर विराजमान.प्रभुंचे ते त्रिमुर्ती लोभस रुप,अलौकीक,निरागस. अहाहा!! शब्दच नाहीत. झाले शरीरच ते.कामाच्या प्रचंड ओझ्याने थकवा वाढला.अशात गिरनार जाण्यापुर्वीचा दिवस येऊन ठेपला.योगिनीमुळे जीव कसानुसा होत होता.लेकरु पेपर्सच्या वेळेस कसे करेल?पण परीक्षेच्या वेळापत्रकात मध्ये मध्ये सुट्टया आल्या.त्यातच आनंदाची गोष्ट शांतिकुंज हरिद्वार मिशन येथुन तीन मुली इंटर्नशिप करता रहायला आल्या.चला योगिनीला सोबत झाली म्हटलं.पण माझी दमछाक वाढली.कारण त्यांचा नाष्टापाणी,डबा परत रात्री उशिरा येणार तर जेवण.त्या थकुन येणार म्हटल्यावर जेवल्यावर झोपल्या.पण गुरुदेव ही अशी गोष्ट आहे की ज्याला कळली त्याला या सर्वात स्वर्गसुखच लाभते. अगदी आदल्या दिवशी एकटी उरले.सोबत कल्याणहुन वहिनी व बाकी सारे आप्तजन येणार होतेच.त्या मुळे तो प्रश्न नव्हता.मन खट्टु झाले पण पुन्हा सावरले. त्यात रात्री सज्जुने इ -तिकिट पाठवले.अशाप्रकारे दैवी नियोजन सफल . दुस-या दिवशी मुलींना कामावर जायचे .योगिनी गेली साडेसात वाजता पेपरसाठी.या मुली दहा वाजता गेल्या.बँकेत जाण गरजेचे होते.पण ट्रेनही होती एक वाजता बोरीवलीहून.म्हटलं चार कपडे व थोडा खायचा सामान तर ठेवायचा आहे.वरवर बॅगेत ठेवला.ओमकार बरोबर महत्वाच्या कामासाठी बँकेत गेले तर तिथेच साडेबारा झाले.गोरेगावलाच होते.डोळ्यांतुन घळाघळा पाणी होते.प्रभु का हा खेळ मांडलास जीवाचा?सकाळीच चहा प्यायला होता फक्त त्यावर पाणी प्यायला सुध्दा फुरसत मिळाली नव्हती.घशाला कोरड पडली होती.मी स्टेशनला निघाले .व ओमकार बॅग घ्यायला घरी.तब्बल वीस मिनीटे अजुन खोळंबा.पाय थरथरत होते.ट्रेन समोरुन निघुन गेली तर..... हे दत्तात्रया,धाव अंत नको पाहूस. तहानेने जीव व्याकुळ झाला होता पण तिकडे दुर्लक्ष केले.पाण्याची बाटली व लस्सीचे पाऊच घेतले तर घाईत धप्पकन पिशवी खाली पडली.लस्सी चे पाऊच केविलवाणे माझ्याकडे पाहून जणु हसत होते.म्हटलं बाबा रे तशीही तुमची फारशी गरज नव्हती. ओमकारला बॅग घेऊन येताना पाहिल्यावर खुप आनंद झाला.पण गाडीची वेळ झाली होती.त्याला कळेना आईला इतकं रडायला काय झालं.तसही चार वेळा जाऊन आली आहे. पण म्हटलं जर गाडी गेली तर तू मला कसही जुनागढला पोहचव.मला जायचचं आहे.रडत रडत च लोकल ट्रेनने बोरीवली गाठलं .प्लॅटफॉर्मला गाडी लागली होती.जीवाच्या आकांताने आत शिरले. हुश्श!! बसल्याक्षणी हात जोडले प्रभु तुझी कृपा न्यारी अशाप्रकारे आमच्या मनिषावहिनी व सर्व आप्तस्वकियांसोबत गिरनारला जाणे झाले.पुढे होळीपौर्णिमेच्या आदल्या रात्री पर्वताच्या प्रथम पायरीस वंदून गणराया,मारुतीरायाचे आशिर्वाद घेऊन पर्वत चढण्यास सुरुवात केली.पण महिनाभरचा थकवा जाणवत होता.पाऊल जड पडत होते.करुणा भाकत होते त्या परम दयाघनाला. आत्मयाराम व परमात्मा यांचे एकदा का सख्य झाले की शरीर,बाह्यपरिस्थिती यांचे स्थान नगण्य ठरते याची साक्षात प्रचिती देणारी ही पाचवी वारी. पर्वतावरील वातावरण विलक्षण सुखद होते.अंगावरुन थंडगार वा-याची झुळूक जात असल्याने थकवा वाटत नव्हता एवढे नक्की.त्यात गोमुखीला प्रसाद लाभला.तोही जीभेवर अलगद चव रेंगाळली. प्रचंड गर्दी त्यात आमच्याबरोबर छोटी भुमी होती.छान आनंदात हळुहळू चढलो. अनंतकोटी ब्रम्हांडनायक योगिराज राजाधिराज सद्गुरु अवधूत चिंतन श्री ब्रम्हाविष्णुमहेश रुपी श्री गुरुदेवदत्तांच्या स्वयंभु पादुकांचे साक्षात दर्शन झाले.डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता , पण हे खरे होते. हे दयाघना, जगी नाचवीसी अनेकानेक खेळ दाविसी। परी भजता तुज अनन्यभावे अलगद तव कुशीत घेसी।। साष्टांग प्रणिपात स्विकारी कधी नच मज अंतरी।। दर्शनानंतर खाली धूनीजवळ जाताना सर्वजण परतीच्या प्रवासाला लागले.वहिनींचे धुनी दर्शन झाले होते तर बरोबर असणा-यांची इच्छा असुनही धुनी दर्शनाची हिंमत झाली नाही.माझी पावल मात्र एकाकी दर्शनासाठी निघाली.प्रभुंनी माहेरपण घडवले प्रत्येकवेळेस.धूनी जवळ प्रभुंचे ध्यान झाले.सुग्रास भोजन झाले. पर्वत बरोबर सकाळी साडेआठनंतर उतरावयास सुरुवात केली तर दुपारी तीन वीसला रुमवर होते. हा संपुर्ण वेळ एकाकी एकटीचा असला तरी प्रत्यक्ष प्रभुंचे ते नियोजन होते.प्रत्येक क्षण त्यांची सोबत.गायत्रीमिशनचे वेगवेगळ्या भागातील कार्यकर्ते भेटणे.मुंबई अश्वमेधावर चर्चा होणे.आपण ही या युगनिर्माण योजनेचा एक महत्वाचा घटक आहोत ही जाणीव प्रत्यक्ष प्रभुंनी करुन देणे.मंत्रलेखनवह्या एवढ्या तारांबळीत वर पोहचवणे ही सुसुत्रता त्या जगनियंत्याचीच नव्हे का? माझ्या आयुष्यातील असे काही मंतरलेले दिवस की ज्यांच्या केवळ स्मरणाने मन प्रसन्न होते.पुलकीत होते. प्रभो, मी अतिशय ऋणी आहे.पुढेही वारंवार येण्याची आस धरुन आहे. सोमनाथावरही विशेष जीव जडला आहे.पण आजचे हे संकट पार कर प्रभो झाडाचे पान ही तुझ्या इच्छेविना हालत नाही.ठाम विश्वास आहे माझा की आजची योजना ही तुझीच आहे.मनुष्यप्राण्याचा अहंकार प्रगतीच्या नावाखाली शिगेला पोहचला होता.तुझी शांतता ही भंग करण्याकरता रोप वे चे धाडस केले गेले. फार मोठी चुक आहे ही!!पण प्रभो त्यासाठी एवढी मोठी शिक्षा नको ना?मनुष्य काय करतो तेच त्याला समजत नाही.कुठेही आपले हात पोहचु शकतात हाच अंहकार नडत आला त्याला. पण करुणाघना,दयेच्या अथांग सागरा करुणा येऊ दे तुला रे प्रभो। आज हे जग सारे वाटेकडे तुझिया डोळे लावुनिया बसले। कोरोनारुपी ब्रम्हराक्षस हा अवतरला। जीवाची शाश्वती नाही कुणाच्या कष्टकरी जीव बिचारा धास्तावला। धनाढ्यही पुरता कोलमडला। मुंबापुरी माझी सारी शोकात पुडाली। दत्ता,नारायणा,श्रीपाद वल्लभा,स्वामीराया येऊ दे करुणा तुला रे प्रभो। मानवतेला या घोर संकटातून पार करवी प्रभो। विश्वंभर विश्वपालका नतमस्तक आम्ही अजाण बालके सारी। तुझ्याचवरी मदार आमची सारी।। धाव रे दत्तात्रया पाव रे दत्तात्रया।। धाव रे दत्तात्रया पाव रे दत्तात्रया।। श्री गुरुदेव प्रेरणेने सौ.रत्नप्रभा-शैलजा शिरवाडकर.

 
 
 

Comments


©2020 by micup.in

bottom of page