top of page

Short Story - चंदन सा बदन चंचल चितवन




शरदला गेले आठ दिवस सकाळी पाचलाच जाग येते आहे.पण उठल्यानंतर काहीही सुचत नाही.गेले दोन महिने लॉकडाऊनच्या नावाखाली घरीच आराम चालला आहे.मज्जाच मज्जा चालु आहे.सुधाच्या पाककलेला तर जणु उधाणच आले आहे.पुरणपोळी,आमरस दिवाळीचे नानाविध पदार्थ,केक,आईस्क्रिम झालच तर बंटीच्या आवडीचे पिझ्झा,पास्ता,व्हेजिटेबल मॅगी.काय काय म्हणुन वर्णावे?

सुरवातीचा एक महिना छान वाटत होत.बायकोच्या सरबराईचे कौतुकही वाटे.पण हळुहळू चीड यायला लागली आहे. अरे!काय हे!ही काय दिवाळी आहे?दिवसेंदिवस बँकेतील जमापुंजी संपत आली आहे.महिन्याचे सगळे हप्ते थकलेत.नविन second home जे फक्त हौस म्हणुन bookकेल होत.त्यासाठी भली मोठी रक्कम आज ना उद्या भरावीच लागणार.रद्द ही करता येणार नाही.तसं झाल तर सुधाचा रडका चेहरा बघवणार नाही. आजकाल तर पहाटेच जाग येते.डोळ्यांसमोर आकडेमोड नाचत असते.काहीही सुचत नाही.

कधी काम सुरु होईल? आज पर्यंत सुधाला व बंटीला कसलीही झळ लागु दिली नाही.त्यामुळे तिला परिस्थितीचं गांभीर्यच नाही.फक्त आॅर्डर सोडण चालु असतं. "शरद,बाहेर गेलास तर या वस्तु आठवणीने आण हं."

खुप वेळा वाटतं सांगावा सुधेला समजावून आर्थिक पेच.नाहीतरी जवळच असं कोण आहे तिच्याशिवाय.या संसारामागे धावताधावता मित्रांचा गोतावळा ही मागे पडला.

किती फुलपंखी होते ते महाविद्यालयीन दिवस!!पटकन उडून गेले.कळल सुध्दा नाही.नोकरी लागली ती स्वतःच्या कर्तबगारीवर.काकांनी पहिलेच स्थळ आणले आणि सुधेचे बोलके हसरे डोळेच जीवन व्यापुन उरले.

शरदला आपल्याच विचारांचे हसु आले.शेजारी बिनघोर निजलेल्या सुधेच्या कपाळावर मायेने हात ठेवला.त्याक्षणीच त्याचा हात पकडून अर्धवट झोपेत ती पुटपुटली, "आज मी ना चॉकलेट केक करणार आहे! व पुन्हा गाढ निद्राधीन झाली.

शरदने कपाळावर हात मारला. लाॅकडाऊनचा काळ वाढतोय.बाहेरचं वातावरण दिवसेंदिवस अधिकच भयावह बनत चाललं आहे.दवाखाने ओसंडून वाहताहेत.खाजगी दवाखान्यांमध्ये लुटमार चालु आहे.गुणाकाराच्या पटीत आजाराने थैमान घातले आहे.त्यात पीकांवर टोळधाड आली आहे.महागाईचा भस्मासुर वाढणार,दारिद्र्य,बेरोजगारी यामुळे व्यसने,चो-या यात बेसुमार वाढ होणार.कसा नेट लागेल.बंटीचे नविन वर्ष सुरु होईल.फी-वाढ ठरलेलीच.विचारांनीच पोटात खड्डा पडला.

तो स्वयंपाकघरात गेला.खाण्यासाठी काहीतरी पहावे म्हणुन फ्रीज उघडला.नविन प्लॅस्टिक कंटेनर दिसला.उघडला तर भल्यापहाटे सुगंधानेच भुक चाळवली.

-तर बाईसाहेब रात्री उशिरापर्यंत ह्यासाठी जागरण करत होत्या.

आंबा बर्फीचा एक तुकडा त्याने हळुच तोंडात टाकला. 'awosome' अलगद शब्द बाहेर पडले.

सहज म्हणुन जवळ जवळ सात आठ बर्फीचे तुकडे पोटात गेले सुध्दा.माठातील थंडगार पाणी पोटात गेल्यावर मात्र फिरुन वास्तव भेडसावु लागले.

एक निश्चित विचार झाला.बस उद्या सुधेशी बोलावचं लागणार .या निश्चयाने कधी पुन्हा झोपेने कब्जा मिळवला जाणवलेही नाही.

"बंटी,अरे मुर्ख मुला!इतकी बर्फी संपवलीस. आता तुझ्या बाबांना काय देऊ?" सुधा किंचाळत होती.डोळ्यावर चांगलीच उन्हं आली होती.घड्याळात सकाळचे साडेनऊ वाजुन गेले होते.गडबडीत उठून बसला.

"सुधे,इकडे ये.कशाला बंटीला रागावतेस." "अरे,रागावु नको तर काय करु?किती छान बर्फी केली होती.तुला आवडते नारे!बंटीने सगळी संपवली."

"नको ओरडूस त्याला.मीच पहाटे संपवली."

सुधेने गर्रकन वळून पाहिले.शरदला तिच्या डोळ्यांत करुणेचा डोह दाटलेला दिसला.

"झोप लागत नाही ना!नको एवढा विचार करुस.थांब जरा ."

म्हणुन कपाटाची तिजोरी उघडून एक पासबुक व एटीएम कार्ड हातात ठेवत म्हणाली, "अरे तु चिडतोस म्हणून सांगितलं नाही तुला.मी ज्या छान छान पर्सेस ,पिशव्या शिवत होते.रिकाम्या वेळात गेले वर्षभर मी त्या शिवुन विकुन टाकत होते.रात्री तु यायच्या आधी सर्व आवरुन ठेवावं लागे.उगाच पसा-यावरुन ती भांडणं नको. तु दिलेल्या घरखर्चाची बचत व पर्सचे पैसे.हे घे . बँकेचे नविन पासबुक व एटीएम पण.लाखभरापेक्षा जास्त असतील. आता लागतील ना तुला? नको इतकी काळजी करुस." व स्मितहास्य करुन स्वयंपाकघरात गेली सुध्दा.

शरद मात्र आ वासुन पहातच राहिला.सगळी मरगळ निघुन गेली होती. भानावर येऊन हलकेच गुणगुणला,

चंदन सा बदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना। मुझे दोष ना देना जगवालो हो जाऊँ अगर मैं दिवाना।।

लेखिका-सौ.रत्नप्रभा-शैलजा शिरवाडकर.

 
 
 

Comments


©2020 by micup.in

bottom of page